गणेश चतुर्थी (गणेशोत्सव)
आपण कुठल्याही कार्याचा शुभारंभ विघ्नहर्ता गणपतीच्या स्मरणाने करतो म्हणून त्याला 'श्रीगणेशा केला ' असेही म्हणतो. गणपती हि देवता वेदकाळातही पूजिली जात होती. याचा पुरावा, 'गणांना त्वां गणपती, कवी कवीनां मुषमश्ववसतम ' या ऋचेतून मिळतो.
आपल्या धर्मात अनेक देवदेवता आहेत. त्यात काही प्राचीन तर काही अर्वाचीन आहेत. त्यात श्रीगणेश, विष्णू, शंकर, भवानीदेवी व नारायण म्हणजे सूर्य, हि पाच दैवते- पंच देवता - या भारतीय संस्कृतीच्या प्रातिनिधिक देवता मानल्या जातात. श्रीगणेश हि फार प्राचीन देवता असून, वरील देवता वैदिक व अवैदिक समाजाचा मिलाफ साधणाऱ्या पुण्यदेवता आहेत. श्रीगणपती हे भारतीय संस्कृतीचे मंगलमय प्रतिकाचे चिन्ह आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस श्रीगणरायाचे आगमन होते, म्हणून या चतुर्थीस गणेशचतुर्थी म्हणतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक या देवतेची मोठ्या भक्तीने पूजा करतात. या दैवताची पूजा, विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणून केली जाते. त्याच्या कृपाप्रसादाने सुबुद्धी व सुविद्या यांचा लाभ होतो, असे मानले जाते. शुभ कार्यांत विघ्ने येऊ नयेत, कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कार्याच्या आरंभी विघ्नहर्त्या गजाननाची प्रार्थना केली जाते. गणेश हि गुणांची, विड्याची देवता आहे. तो ज्ञानमय, विज्ञानमय आहे. त्याच्या मूर्तीत सारे शब्दब्रम्ह एकवाटले असून अठरा पुराणांचे अलंकार धारण केले आहेत. अशा या गणेशाचे रूप आगळेवेगळे आहे. त्याला हत्तीचे डोके आहे. याचाच अर्थ असा कि, तो विद्येचा सागर व श्रेष्ठ विद्वान आहे. त्याचे कान सुपासारखे मोठे आहेत, याचा अर्थ तो बहुश्रुत आहे. डोळे बारीक आहेत, म्हणजे कोणत्याही गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करणारा आहे. इतकी विविधता कोणत्याही देवतेच्या आढळत नाही. गणपती- गणेश जसा विद्येचा सागर आहे, तास तो सैन्याचा अधिपतीही आहे. त्याने परशुरामाशी दोन हात करून क्षत्रियांना विजय मिळवून दिला. या युद्धात गणपतीचा एक दात तुटला म्हणून त्याला 'एकदंत ' हे नाव प्राप्त झाले. अनेक कलांचे प्रेरणास्थान म्हणजेच गणपती. त्याचे चार हात, या चार दिशा आहेत. सूर्योपासनेतील सप्तमाचा २१ अक्षरे म्हणचे गजवदनाच्या २१ दुर्वा आहेत. याचे वाहन उंदीर. विश्वाचे रंगरूप कुरतडून टाकणारा, रात्रीचा अंधःकार हाच निशाचर उंदीर आहे. काही ठोकणी एक पाय सिंहावर व दुसरा पाय उंदरावर दाखविला आहे. गणेशपूजेत वाहण्यात येणाऱ्या पत्रींचे एक विशेष व आगळे असे स्थान आहे. या गणेश- पत्रित विविध प्रकारच्या एकवीस वनस्पतींचा समावेश आढळतो. भाद्रपदात सर्व भूमी हिरवीगार झालेली असते. कोणतीही वनस्पती या काळात सहज उपलब्ध होते. अशा वेळी समाजातील अगदी गरीबात गरीब भक्तसुद्धा पत्रीचा उपयोग करू शकतो. या गणेशपत्रित चिमुकल्या दूर्वांपासुन ते पिंपळासारख्या मोठ्या वृक्षाचा समावेश आहे. श्रीगणेशप्रिय दुर्वांमध्ये औषधी गुण आहेत. 'गणानां त्वां गणपतिं ' यावरून विविध जनपदांचा तो प्रमुख बनला. गणपती म्हणजे संघ. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी १८९२ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु केली. त्यामुळे समाजात एकटा व संघटनशक्ती या देशातील सर्वसामान्य नागरिक धर्मभावनेकडे एकत्र होतात. हे या समाजाचे मर्मस्थान लोकमान्य टिळकांनी ओळखले होते. त्यामुळे गणेशोत्सवाला तर होतेच, पण त्याचबरोबर ते सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे एक व्यासपीठ बनले. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे गणपतीवर विलक्षण प्रेम आहे. त्याच्यावरील भक्ती आणि प्रीती जेवढी महाराष्ट्रात आहे, तेवढी अन्यत्र कुठेच आढळणार नाही. गणपतीची सर्व पवित्र स्थाने महाराष्ट्रातच आहेत. भारताबरोबर मलाया, सिंगापूर, मॉरिशस बेट, ब्रह्मदेश, सिलोन, तिबेट, चीन, जावा, बाली आदी अनेक आशियाई राष्ट्रात गणपतीचे भक्त आहेत. तेथे सर्वत्र पूजा-अर्चा केली जाते. शब्दसृष्टीचे भाषाप्रभू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भावदीपिकेत गणपतीचे स्तवन आरंभीच केले आहे ते असे - ॐ नमोजी आद्या देव प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या आत्मरुपा । देवा तूचि गणेशु ।। |
|