रक्षाबंधन
आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा, असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते.
भाऊ-बहिणीच्या या प्रेमाला उधाण येते ते राखी-पौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख-शांती लाभू दे, अशी प्रार्थना करते. तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते. तर भाऊ आपल्या ताकदीप्रमाणे बहिणीला पैसे, वस्तू देऊन खुश करीत असतो. हा राखी पौर्णिमेचा सण प्राचीन काळापासून चालत आला असून, पूर्वी हा सण ब्राम्हणांचा सण म्हणून ओळखला जात होता. या दिवशी श्रावणी करणं हा प्रकार असतो. श्रावणी करणं म्हणजेच मन शुद्ध करणं. निरनिराळे मंत्र म्हणून गुरुजी होमहवन करतात व जमलेल्या लहान-थोरांना पंचगव्य देतात. प्रत्येक पुरुषाला नवीन यज्ञोपवीत घालायला देतात. या सणाबाबत खूप कथा प्रचलीत आहेत. महाभारतात या पवित्र सणाविषयी माहिती मिळते कि, त्या वेळी देव व दानव यांत जबरदस्त युद्ध झाले. दानवांकडून देव हरू लागले. इंद्रासहित सर्व देवांना सामना करणं कठीण झालं, तेव्हा गुरु बृहस्पतीने श्रावणातील पौर्णिमेच्या दिवशी 'अपराजिता ' नावाचे रक्ष कवच इंद्राच्या उजव्या हाताला बांधले. तेव्हा देवांना दानवांवर वजय मिळविण्यास वेळ लागला नाही. पुराणकथा अशी आहे कि, देव दानवांकडून पराजित होत होते, तेव्हा इंद्राची पत्नी इंद्राणीने स्वतःच्या पतीला विजय मिळावा म्हणून राखी बांधली होती. त्यानंतर इंद्राला युद्धात विजयसुद्धा मिळाला होता. पूर्वी राजा युद्धासाठी निघाला असता, त्याच्या रक्षणार्थ पुरोहित त्याच्या हाताला राखी बांधत असे. आता हे काम बहीण करते. राजपूत लोक लढाईवर जाण्यापूर्वी बहिणीकडून स्वतःला ओवाळून घेत व भाऊ सुखरूप घरी यावा म्हणून बहीण राखी बांधत असे. सुरुवातीला हा सण उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित होता. आता हा सण भारतवर्षात सर्वत्र साजरा होतो. काही ऐतिहासिक घटनासुद्धा या सणाच्या बाबतीत आढळून येतात. गुजरातचा बादशहा बहादुरशहा याने चितोडगडावर चढाई केली, तेव्हा युद्ध होईल अशी परिस्थिती नव्हती. परंतु चितोडगडाच्या राजमाता, कर्णावतीने चतुराई वापरून मोगल सम्राट हुमायूनला एक राखी पाठवली आणि स्वतःचा भाऊ बनवले. हुमायूनने स्वतःचे सैन्य पाठवून चितोडगड वाचवला. दुसरी एक ऐतिहासिक माहिती अशी आहे कि, सिकंदर जेव्हा झेलम नदीच्या किनारी आला, तेव्हा त्याने पहिले कि, एक हिंदू स्त्री नदीकिनारी पूजा करून, राखी अर्पण करीत आहे. तेव्हा सिकंदराने राखीचे महत्व त्या स्त्रीकडून समजून घेतले व राखी बांधून घेतली. बहीण-भावाचे नटे दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. |
|