गुढीपाडवा
सर्व दृष्टीने प्रसन्न असणारा चैत्र महिना जेव्हा येतो, तेव्हा सृष्टिमातेच्या लाडक्या वसंताची उधळण चाललेली असते. वृक्षांना नवी पाने फुटू लागतात. पानांअभावी अशक्त दिसणारी झाडे, आता लहान मुलांसारखी गुटगुटीत दिसू लागतात. निसर्गराजा खुशीत 'शीळ' घालीत असतो. उत्सव, खेळ व करमणूक यांचा त्रिवेणी संगम याच महिन्यात पाहावयास मिळतो. या महिन्यात हिंदू धर्मियांच्या नववर्षाला प्रारंभ होतो.
आनंदाप्रीत्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणारा हा सण 'गुढीपाडवा' म्हणून ओळखतात. गुढीपाडवा (वर्ष प्रतिपदा) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून नवीन कामाचा, कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो. या महिन्यात हवेतील गारवा कमी झालेला असतो व उन्हाळ्याला प्रारंभ होतो. त्यामुळे सुरुवातीच्या या उष्म्याला तीव्रता नसते. पहाटे लवकर उठून मन व शरीर प्रसन्न करण्यासाठी प्रातःकाळाची आन्हिके उरकून स्नान केले जाते. घरातील देवांच्या पूजेबरोबर, हा सण ज्या वारी आला आहे, त्या वाराच्या अधिपतीची पूजा केली जाते. घरातील सर्व स्त्री-पुरुष, लहान-थोर मंडळी नवे कपडे घालून या सणाच्या आगमनाची तयारी करण्यात गर्क असतात. स्त्रिया घरासमोरील अंगणात, तुळशी-वृन्दावनासमोर रांगोळी काढतात व लहान मुले बाजूला उभे राहून आनंद लुटत असतात. पूर्वी गुढी उभारण्यासाठी चांदीचा कलश व जरीचे वस्त्र वापरले जाई. आजसुद्धा हि प्रथा आहे. आता वस्त्राऐवजी भगवा झेंडा काठीला बांधून त्यावर गडू किंवा छोटा तांब्या उपडा ठेवून त्यावर झेंडूच्या फुलांची भरगच्च माळ, साखरमाळ बांधतात. हि गुढी खिडकीतून बाहेर डोकावताना दिसते. या दिवशी कडुलिंबाच्या कोवळ्या पानात, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गुळ, घालून हे मिश्रण वाटले जाते. नंतर घरातील सर्वांना हा प्रसाद म्हणून दिला जातो. हे नेमाने खाल्ल्यास रोगराई आपल्यापासून दूर पळून, शरीर निरोगी व सुदृढ बनते. या दिवसाला ऐतिहासिकरित्यासुद्धा खूप महत्व आहे. या दिवशी अनेक महत्वाच्या घटना घडल्या. प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवास भोगून, रावणाचा निःपात करून, विजयी होऊन अयोध्या नगरीत आले. तो हाच वर्षप्रतिपदेच्या दिवस होता. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली तो 'चैत्र' होता, म्हणून त्या महिन्याची सुरुवात गुढ्या उभारून केली जाते. शालिवाहनाने शकाचा पराभव कारण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले, त्यात प्राण निर्माण करून फौज तयार केली. थंड व निर्जीव समाजात, शालिवाहनाने चैतन्य निर्माण करून, शंकाच मोठा पराभव केला. त्या पराक्रमाची स्मृती म्हणून, शालिवाहनाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला शक सुरु केला. इंद्राने वृत्तसुरास ठार मारले. याप्रकारे शुभ-कृत्यांचा मंगल मुहूर्त म्हणजे हा पाडवाच होय. या दिवसापासून सर्वांनी संकल्प करून भरपूर अभ्यास करण्याचे स्वतःलाच वचन दिले पाहिजे. आपली प्रगती आपल्यालाच कशी साधता येईल व त्याप्रमाणे कष्ट करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, हा विचार सतत मनात ठेवला पाहिजे. आचरण मंगल व सात्विक करण्याचा निश्चय जरूर करावा. नातेवाईक, मित्रमंडळींना भेटून शुभेच्छा व्यक्त कराव्यात. परस्परांतील स्नेह, एकोपा घडवून आणण्याची किमया या सणात आहे. अशी हि यशाची गुढी उंच उंच फडकू दे ! फडकू दे !! |
|