शिवजयंती (शिवाजी महाराज जयंती)
उषःकाळ होण्यापूर्वी अंधार पसरावा तसे झाले होते. यवनांनी लढाया, जाळपोळ, लुटालूट करून सारा महाराष्ट्र होरपळून टाकला होता. कुणी कोणाचे सांत्वन करावयाचे हा प्रश्न पडत होता. यवनांची नजर पडताच आकाशात विहार करणारे पक्षीसुद्धा खाली पडायचे. यांच्या तोफांचा आगीने जमीन भाजून निघत होती. सर्वत्र गलितगात्र वातावरण भासत होते. अशा या अंधाऱ्या वातावरणात शिवनेरी किल्ल्यावरून बालकाच्या रडण्याचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला. सह्याद्रीच्या काड्या कोपऱ्यात पुन्हापुन्हा घुमू लागला. या रडण्याच्या आवाजात कारुण्य नव्हतं, तर उषःकालची हास्यलकेर होती. इतकी वर्षे गलितगात्र झालेल्या वातावरणात चैतन्य निर्माण झाले. आकाशातील सारे तारे, ग्रह हा आवाज ऐकण्यासाठी सज्ज झाले. जिजाबाईसाहेबांच्या उदरी, शिवनेरी किल्ल्यावर, १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुत्र जन्माला आला. तेव्हा शुक्ल संवत्सर चालू होते.
बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणूनच बाळाचे नाव शिवाजी ठेवले, तरी सर्वजण शिवबा म्हणूनच कौतुकाने हाक मारीत. हा शिवबा शिवनेरीवर चंद्रकलेप्रमाणे वाढत होता. पुण्यातील लाल महालात रामायण, महाभारत, राजनीती, शास्त्रे यात तो रममाण होई. शिवबाचा जन्म मुजरा करण्यासाठी झाला नाही, हे शहाजीराजांनी अगोदरच ओळखले होते. त्यांना आनंद वाटत होता. भोसले नाव महाराष्ट्रातून पुसून टाकण्यासाठी मुस्तफाखानाने आणि बाजीराव घोरपड्यांनी चंग बांधला होता. त्यांनी दगाफटका करून शहाजी राजांना पकडले.छावणीचे नुकसान केले. शहाजीराजे पकडले गेले हे कळताच राजगड सुन्न झाला. परंतु येणारी दुःखे हि भविष्यात चांगले घडावे म्हणूनसुद्धा येतात. शिवाजीमहाराज या प्रसंगाने न डगमगता युद्धाला सामोरे गेले व अफाट शक्तीच्या मुस्तफाखानाचा पराभव केला. शहाजी राजांच्या सुटकेसाठी शहाजींनी वापरलेली मुत्सद्देगिरी अचाट अशी होती. शके १५८१ ला देवद्वेष्ट्या अफझलखानाला युक्तीने ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या विजयाची घौडदौड चालूच राहिली. दादोजी कोंडदेवांनी त्यांना महाराष्ट्रातील सर्व भागात हिंडवून डोंगर, दऱ्या, किल्ले इत्यादींची माहिती करून दिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. या किल्ल्याची डागडुजी करीत असता त्यांस द्रव्याचा हंडा सापडला. त्या द्रव्याने त्यांनी रायगड किल्ला बांधला. दादोजी कोंडदेवांनी मारातवेळी सर्वांना बोलावून, त्यांच्यासमक्ष खजिन्याच्या किल्ल्या शिवाजीमहाराजांच्या स्वाधीन केल्या आणि गोब्राह्मणांचे प्रतिपालन करण्याचे कार्य पुढे चालविण्यास सांगितले व देवी तुम्हांस यश देईल, असा आशीर्वाद दिला. पुढे शिवाजी महाराजांनी पुणे परगणा हस्तगत करून चाकण, कोंडाणा व पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले. कोकणच्या स्वारीत त्यांना प्रसिद्ध भवानी तलवार व बालाजी नावाचा मुलगा मिळाला. तोच पुढे बालाजी आवाजी चिटणीस या नावाने प्रसिद्ध झाला. शिवाजी महाराजांच्या एकनिष्ठ सेवक आबाजी सोनदेव माने याने कल्याण प्रांतावर स्वारी करून तेथील सुभेदार व कुटुंबातील माणसे पकडली व त्यातील सुभेदाराची रूपवती सून महाराजांकडे पाठवली. महाराजांस हि गोष्ट रुचली नाही. त्यांनी आबाजी सोनदेवची चांगली कानउघाडणी करून भर दरबारात 'अशा रुपवार आईच्या पोटी जन्मलो असतो, तर आम्हीही असेच रूपवान झालो असतो ' असे उद्गार काढले व तिला चोळी-बांगडी देऊन सन्मानाने तिच्या घरी पाठवले. जगाच्या इतिहासात अणे मुत्सद्दी, वीर योद्धे झाले परंतु शिवाजी महाराजांसारखा नीतिमान, मुंसद्दी, विन पुरुष क्वचितच पाहावयास, ऐकावयास मिळेल. |
|