नवरात्रोत्सव (नवरात्र उत्सव )
अश्विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात, परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूची हिरवीगार सृष्टी पाहून मन प्रसन्न होते. निसर्गाच्या सौंदर्याची उधळण पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. धरणीमातेबरोबर सर्वजण सुखावले असतात. अशा या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्र येते.
वेदकाळात परमेश्वर मंत्रस्वरुपात होता. जसजसा मानव शिल्पकलेत प्रावीण्य मिळवू लागला, तसतसा देव-देवतांना मूर्ती स्वरूपात घडवून त्यांची अनेक रूपे तो प्राणप्रतिष्ठापना करून पुजू लागल्याचे दिसून येते. भारत वर्षाच्या संस्कृतिक इतिहासामध्ये पुराणकाळ हा दैवतदृष्ट्या व उपासनदृष्ट्या अत्यंत समृद्ध काळ मानला जातो. तेव्हा आदिशक्तींना मातृकाशक्ती मानून त्यांचे पूजन सुरु झाले. दैवीशक्ती हि दुर्गा, भवानी, रेणुका, काली, अंबा, महालक्ष्मी , सरस्वती, संतोषी, महिषासुरमर्दिनी, चामुंडा, चंडिका, कालिका, एकविरा, वज्रेश्वरी, हरबसणी, जीवदानी इ. विविध नावांनी उपासली जाते. भारतात अनेक शक्तिस्थाने आहेत. यातील कित्येक मानवाला अज्ञात असून काही ठिकाणी तर या देवता मूर्ती स्वरूपात आढळतातच, असेही नाही. तरीही हि स्थाने भक्तिभावाने पुजली जातात. नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्र उत्सव म्हटला जातो. तामसी, क्रूर वृत्तीच्या दुर्जनांचे प्राबल्य जेव्हा भूतलावर वाढते, तेव्हा त्या दुर्जनांपासुन साधू सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देवी अवतार धारण करते. ती म्हणते, "भक्तांनो, मी तुमच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे. तुम्ही मला शरण आलात कि, मी प्रगट होईन तुम्हास दुःखमुक्त करिन. त्यासाठी तुम्ही अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस माझा उत्सव साजरा करीत जा. घटपूजा, होमहवन आदी करून माझे पूजन करा. जे माझ्यावर अचल निष्ठा ठेवतील, त्यांच्यामागे मी नेहमीच असें. " हा उत्सव साजरा करण्याचा सर्वांना अधिकार आहे. प्रतिपदेस देवळात किंवा घरी घटस्थापना केली जाते. नऊ दिवस सप्तशक्तीचा पाठ वाचला जातो. नऊ दिवस नंदादीप तेवत असतो. रोज एक माळ वाढवितात. एकूण नऊ माळा होतात. घराशेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात ते दसऱ्याच्या दिवशी टोपीत किंवा पागोट्यात घालतात. नवव्या दिवशी होम होतो. ब्राम्हण व सुवासिनींना जेवावयास बोलावले जाते. होमात कोहळा अर्पण करतात. शेवटच्या दिवशी होमहवन होते. याचे उत्थापन व विसर्जन विजयादशमीला होते. विष्णूच्या हातात सुदर्शन चक्र, रामजवळ धनुष्यबाण आणि परशुरामजवळ परशु असे प्रत्येकि एकच शस्त्र असताना या डिव्हिजवळ मात्र अनेक शस्त्रे आहेत. या शस्त्रबळावर ती सामर्थ्यावर, बलवान ठरली. प्रतापगडाच्या भवानी देवीने श्री शिवछत्रपतींना तलवार प्रसाद म्हणून दिली. या तलवारीच्या सामर्थ्यावरच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पेशवेसुद्धाप्रतिपादिदिवशी स्वतः घटस्थापना करून अंबेची स्थापना करित असत. द्वितीयेला रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करीत . तृतीयेला अंबा अष्टभुजा शिणगार घालून विराजमान होत असे. सप्तमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावर आदिमातेची पेशवयांकडून पूजा बांधली जात असे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकला, जो वज्रेश्वरीच्या प्रेरणेमुळेच. अशा या शक्तिदेवतेचे, आदिमातेचे स्वरूप आपण अनेक रूपात पाहत आलो आहोत. राधेसारखे प्रणयिनीचे रूप, गौरीसारखे ममतामयी रूप किंवा दुर्गेसारखे संहारक रूप या आदिमातेने घेतले आहे. भारतवर्षात नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. |
|